रविवार, १३ नोव्हेंबर, २०११

कधीच

कधीच आले नाही त्यांच्या वाटयाला
उपेक्षेचे गहिरे दु:ख,
अपेक्षेच्या वाटेला ते कधी गेलेच नव्हते...

कधीच वाटला नाही त्यांना
काळोखसुद्धा, काळोख!!
प्रकाशाची ऒळख कधी झालीच नव्हती...

कधीच वाटली नाही त्यांना
आपल्या मरणाची भीती,
जगण्याची ऒढ कधी जन्मलीच नव्हती...

कधीच घेरले नव्हते त्यांना
निराशेच्या काजळीने,
आशेची वात कधी लागलीच नव्हती...

कधीच कोणाला समजले नाही त्यांनी
केव्हा हलविला आपला मुक्काम,
वस्तीची नोंद कुणी घेतलीच नव्हती...

(‘आघाडी’-दिवाळी अंक/मालवण/२००१)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा