शनिवार, १२ नोव्हेंबर, २०११

रत्न

बाहेर काळाकिट्ट अंधार घोंघावत होता...
आणि मी चालत होतो कंदिलाच्या प्रकाशात,
शोधत एक अनमोल रत्न... हरवलेले,
ज्याच्या प्रकाशात जाणार होता उजळून
सारा अंधार,
भोवतालचा आणि आतलाही!

चौकाचौकात, वळवळणावर, कोप~याकोप~यावर
दिसत होती असंख्य माणसे
म्हटल्यास ओळखीची, म्हटल्यास अनोळखी
विचारीत होतो त्यांना,
शोधत होतो त्यांच्या चेह~यावर
पाहत होतो त्यांच्या डोळ्यातून थेट आत-
-तीही दाखवीत होती रत्ने काढून काळीजखिशातून...

असंख्यांची असंख्य रत्ने, पण-
एकाच प्रकारची
फक्त आपलाच चेहरा उजळविणारी,
काजव्यासारखी...
मला तर हवे होते रत्न,
साराच अंधार तेजाळ करणारे!

चालता चालता मला जाणवले
पंधरा-वीस गल्ल्या ओलांडून
आलो आहोत आपण गावाबाहेर-स्मशानरस्त्यावर...
मी परतणार
तेवढ्यात एका चकचकीत शुभ्र तुकड्याने
खेचून घेतले माझे डोळे-
तो होता एक फार्म, जीर्ण...
मळकटलेला,
कुणीतरी, केव्हातरी खरडलेला...
मी वाचू लागलो कंदिलाच्या मंद प्रकाशात-
अर्जदाराचे नाव, गाव, धर्म, पंथ, जात-
सारे सारे अस्पष्ट होते,
(सूक्ष्मदर्शक यंत्रातून दिसलेही असते कदाचित)

-आणि, आणि मला अत्यानंद झाला
जे रत्न शोधत होतो ते गवसल्याचा!
अर्जदाराने लिहिले होते-
कालम नं, ४ -
राष्ट्रीयत्व : भारतीय!!

(दै. सकाळ, कोल्हापूर, २६.जाने. १९८६)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा